बैलगाडा शर्यत बंदी मुळे ग्रामीण भागामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एका बाजूला गोवंश हत्या बंदी कायदा करायचा आणि दुसऱ्या बाजूला बैलगाडी शर्यतीवरील बंदी घालून गोवंश निर्माणच होणार नाही अशी यंत्रणा उभी करायची. यासारखे शेतकरीविरोधी कायद्यामुळे ग्रामीण भागातील गोवंश भविष्यकाळात चित्रात दाखवावे लागते. अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी बैलगाडा शर्यत या विषयाला खतपाणी घातले पण रस्त्यावरची लढाई समर्थपणे आणि भावनेच्या जोरावर लढण्यासाठी कोणताच राजकीय नेता छातीचा कोट करुन मैदानात आला नाही हे बळीराजाचे आणि बैलगाडा शर्यत आंदोलनाचे अपयश.

महाराष्ट्रातील युवा नेतृत्व आणि आपल्या धगधगत्या वाणीने ज्वलंत आणि जीवंत प्रश्नाला वाचा फोडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या स्टाईलने या प्रश्नाला न्याय देण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे. सांगली जिल्ह्यातील झरे गावामध्ये लाखोची बैलगाडा शर्यत आयोजित करून बैलगाडा शर्यतीस विरोध करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडले आहे.
न्यायालयामध्ये समक्ष आणि ताकतीने बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी युक्तीवाद होत नसल्यामुळे पेटा या कायद्या अंतर्गत बैलगाडा शर्यत बंदी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी हाती घेतलेला आसूड बैलगाडी शर्यत बंदी उठवणारी निकाल रेषा पार करे पर्यंत खाली ठेवू नये अशी भावना सर्व सामान्य शेतकऱ्याची आहे.
मग यासाठी प्रशासनाच्या आणि गांधारीच्या भूमिकेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीवर चाबकाचे वार काढण्यामध्ये सुद्धा कोणतीही कसर ठेवू नये.
आंधळ्या प्राणी प्रेमाने बैलगाडी शर्यतीला विरोध करणाऱ्यांच्या कानशिलात लावण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचा हात बळकट करणे प्रत्येक शेतकऱ्याचे कर्तव्य आहे.
तामिळनाडूच्या धर्तीवर जनआंदोलनाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर सर्वसामान्य बैलगाडा शर्यत मालक आणि शेतकऱ्यांना न्याय देतील असे वातावरण सध्या तरी राज्यात निर्माण झाले आहे.
हाती घेतलेल्या प्रश्नांची जाण असणाऱ्या आणि परखडपणे आपली मते व्यक्त करण्याचा स्वभाव असणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या आंदोलनाने प्रशासनाबरोबरच राज्य सरकार सुद्धा उघडे पडणार यामध्ये शंका नाही.
गाईला माता मानणाऱ्या भाजपमधील नेत्यांचा पडळकर यांना किती पाठिंबा मिळतो यावर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. भाजपचे गोमाते विषयी असणारे प्रेम बेगडी आहे का…? अस्सल आहे. याची सुद्धा उकल पडळकरांच्या आंदोलनामुळे होणार आहे.
गोपीचंद पडळकर यांचा राजकीय विचार कोणताही असो..! याचे सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणे घेणे नाही, पण एखाद्या आंदोलनामध्ये सिंहासारखी उडी घेऊन सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या आणि बैलगाडा मालकांच्या आशा पल्लवीत करणाऱ्या धुरंधर नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीची निकाल रेषा पार करेपर्यंत तरी आंदोलनाचा आसूड खाली ठेवू नये. अशी भावना शेतकऱ्यांची आहे यात तिळमात्र शंका नाही.
पत्रकार विशाल सूर्यवंशी…✍????
संपर्क- 9860752273